नागपूर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे परिणाम म्हणून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू झाली. ती काशी थांबवावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आला आहे. त्यांचे कुठलेही कामे होत नाहीत. त्यामुळे सेनेतील ९० टक्के आमदार हे सध्याच्या परिस्थितीत नाराज झाले आहेत. यामुळे अजूनही वेळ गेली नाही. शिवसेनेने याचा विचार करावा, असे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज्यात निवडणुका होत असताना देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा दाखवून आमदार निवडून आणले. मोदी यांचा चेहरासमोर करून खासदार निवडून आणले. निवडणुकीच्या काळात प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असे अनेकदा बोलूनही दाखवले. मात्र, त्यानंतर पाठीत खंजीर खुपसला. या बेईमानीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अनेकांची भाजपसोबत युती करण्याची इच्छा असल्याचा दावाही बावनकुळेंनी केला.
सेनेच्या सर्व खासदार, आमदारांना माहिती आहे की भाजपसोबत युती करून आपण निवडून आलो आहोत. भाजपच्या नेतृत्वात लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या. त्यानंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, हे सेनेच्या आमदारांना पटलेलं नाहीये. सेनेच्या आमदारांचे एकही काम होत नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. दुसरीकडे मंत्रालयावर काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे मतदारसंघ कमजोर होत आहेत. नेते कमजोर होत आहेत. सेनेचा फायदा घेत राष्ट्रवादी अन् काँग्रेस स्वतःचे पक्ष मजबूत करत असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.