नवी दिल्ली : देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाची दुसरी लाट काहीशी आटोक्यात आल्याचं दिसत आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दुसऱ्या लाटेतील स्थिती पाहून केंद्रासह राज्यानं तिसऱ्या लाटेची तयारी सुरु केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. असं असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखणं अशक्य असल्याचं वक्तव्य केंद्र सरकारच्या कोरोना कृती गटाचे सदस्य व दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीच केलं आहे.
ते म्हणाले की, देशात दुसरी लाट आटोक्यात येत आहे. मात्र, पुढील सहा ते आठ आठवड्यात म्हणजेच दोन महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. तिसऱ्या लाटेला रोखणं अशक्य आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असू शकते, असेही ते म्हणाले.
'आपण अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असून लोकांकडून पुन्हा नियमांचं उल्लघंन होत असल्याचं निदर्शनास येत आहे. असं वाटतेय की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जे झालं, त्याकडून आपण काहीच शिकलेलो नाही. बाजारपेठांमध्ये पुन्हा गर्दी होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर होत नाही. लोकांच्या याच निष्काळजीपणामुळे देशात तिसरी लाट अटळ आहे. पुढील सहा ते आठ आठवड्यात देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात होईल. लोक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे देशात तिसरी लाट अटळ आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.'