पुणे : पुण्यात निर्बंध शिथील केल्यानंतर “पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, खोपोली अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत असल्याचं सांगितलं आहे. इतक्या मोठ्या रांगा लागत आहेत. नागरिक असं का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण काही जण ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत. तसं जर झालं तर पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावं लागेल. तसे आदेश काढावे लागतील,” असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिला.
“कोरोना संकट हळूहळू कमी होत असलं तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय घेतला असून सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण जास्त आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.
“टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही ठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत असल्याचं सांगितलं आहे. खासकरुन अमेरिका आणि इंग्लंड येथे मोठ्या प्रमाणात लसीसकरण होऊनही अशी परिस्थिती झाली आहे. नीट काळजी घेतली नाही आणि जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं. ही गोष्ट होता कामा नये,” असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
शनिवारी आणि रविवारी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे सांगताना अजित पवारांनी लोकांना पिकनिकला किंवा विनाकारण फिरण्यासाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस