मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही वाढ होत आहे. तसंच बाजारपेठांमध्येही तुफान गर्दी करताना नागरिक दिसताहेत. त्यामुळे डेल्टा प्लसचा धोका पाहता आणि कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाची ब्रेक द चेन यासाठी 20 दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतला होता. राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी करणं हे आरोग्य प्रशासनापुढे मोठं आव्हान आहे. कारण महाराष्ट्रात येत्या तीन- चार आठवड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनलॉकची पाच टप्प्यातील पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. तसंच दुकानांच्या वेळा पुन्हा एकदा कमी करण्यात येतील, असेही संकेत देण्यात आलेत. येत्या दोन दिवसात याबाबतची नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.