अहमदनगर : शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी आज भेट घेवून चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खोत बोलत होते.
खोत म्हणाले, सरकारमध्ये नसताना शेतक-यांच्या बांधावर जाऊन नैसर्गिक नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये तर बागायती शेतक-यांना हेक्टरी १ लाख रूपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी करणारे सध्याचे मुख्यमंत्री हे कोरोनाच्या नावाखाली घरात बसून कारभार करीत आहेत. कोरोना संकटाने अडचणीत असलेल्या शेतक-यांना पीक कर्ज, खते, बि - बियाणे मिळत नाहीत. मोर्चे, उपोषणे कोणी करू नका असे सांगणा-या राज्य सरकारलाच ख-या अर्थाने कोरोना झालाय अशी टिका खोत यांनी केली.
हजारे यांचे सामाजिक चळवळीतील योगदान खूप मोठे आहे. दुरदृष्टी ठेऊन सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांबरोबर ते लढतात. अण्णांच्या चळवळीतून अन्यायकारक व्यवस्थेविरोधात लढण्यासाठीचे तरूणांना बळ मिळते. पाणलोट क्षेत्रविकासाचे त्यांचे काम पाहून मी २१ वर्षांपासूनचे माझे गाव टॅंकरमूक्त केले. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकारी कारखाने व बॅंका टिकल्या पाहिजेत. या साठी ५० सहकारी कारखाने खाजगीकरणाविरोधात सर्वात प्रथम अण्णांनी लढा उभारला.
हजारे यांनी राज्य सरकारकडे शेतक-यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला तर शेतक-यांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास वाटतो, असे माजी मंत्री खोत म्हणाले. पुढील चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र व विदर्भाचा दौरा करून शेतक-यांच्या प्रश्नांवर जनजागृती करणार असल्याचे ते म्हणाले.