औरंगाबाद : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून पावसाला सुरुवात होताच राज्यात वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच केवळ वीज कडाडल्याचा आवाज ऐकून एका चिमुकलीचा दुर्दैर्वी मृत्यू झाला आहे. विज कडाडल्याचा आवाज ऐकून दारात उभी असलेली ही चिमुकली बेशुद्ध झाली, यातचं तिचा करुण अंत झाला आहे. ही घटना औरंगाबादच्या मोंढा परिसरातील तक्षशिला नगरात घडली आहे.
रविवारी सायंकाळी औरंगाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. दरम्यान एक सहा वर्षाची चिमुकली दारात उभं राहून पावसाचा आनंद घेतं होती. त्याचवेळी आकाशात कर्कश आवाजात एक वीज कडाडली. अचानक विजेचा आवाज आल्याने घाबरलेली चिमकुली बेशुद्ध पडली. या धक्क्यात तिचा करुण अंत झाला आहे. केवळ विजेचा आवाज ऐकून दुर्दैर्वी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अक्सा इस्माईल शेख असं 6 वर्षीय मृत बालिकेचं नाव आहे. अक्साचे वडील मजुरीचं काम करतात. रविवारी सुट्टी असल्याने तेही आपल्या कुटुंबीयांसोबत घरीच होते. पाऊस पडत असताना सहा वर्षांची अक्सा दारात उभी राहून पावसाचा आनंद घेतं होती. पण अक्साचा हा आनंद काही क्षणांतच कुटुंबीयांसाठी दु:खाचं कारण बनला आहे. या दुर्दैर्वी अपघातात अक्सा बेशुद्ध झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला त्वरित तिला घाटी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचारांदरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास अक्साने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.