नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत बोलले होते, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केले आहे. यावेळी पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाही सांगितला.
लोकशाहीमध्ये कोणालाही मुख्यमंत्री होता येते. ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात आणि ज्यांना लोकांचा पाठिंबा असतो तो मुख्यमंत्री होतो. सध्या महाविकास आघाडीकडे बहुमत असून आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. हे पाहता आता मुख्यमंत्रिपदाची जागा रिकामी नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे.
निवडणुकीला अजून अवकाश आहे. त्या अगोदरच अशा प्रकारचे भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोलाही पटेल यांनी लगावला आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र वाचून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे निवडणुकीबाबतचा निर्णय हा २०२३ मध्ये होईल असे म्हणत आहेत. त्यामुळे या विषयावर आताच बोलणे योग्य असणार नाही, असे पटेल पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोगी यांची बंद खोलीत भेट घेतली होती. यावरही पटेल यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांनी चर्चा करणे यात काही गैर आहे असे आपल्याला वाटत नसल्याचे पटेल म्हणाले.