मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या तिसऱ्या मंचाच्या बैठकीमुळं राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. देशातील अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीला शिवसेनेचं कोणीही उपस्थित राहणार नसल्यानं उलटसुलट चर्चा होत आहे. मात्र, राऊत यांनी या तर्कवितर्कांना काहीही अर्थ नसल्याचं म्हणाले आहेत.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांनी बोलावलेली बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाही. माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्र मंचाच्या नेत्यांची आहे. या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तेलुगू देसम पक्ष, तेलंगण राष्ट्र समिती यापैकी कोणीही जाणार नाही. ही राष्ट्र मंचापुरती मर्यादित बैठक आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांनी तिथं जाण्याचा प्रश्नच येत नाही,' असं राऊत म्हणाले.
'शरद पवार हे मोठे नेते आहेत. अनेक क्षेत्रातील लोक त्यांचा सल्ला घेत असतात. आजची बैठक ही राष्ट्र मंचची आहे. त्यांना काही मुद्द्यांवर पवारांशी चर्चा करायची आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे असं म्हणता येईल. पण त्याला मोदी विरोध, भाजप विरोध असं म्हणणं चुकीचं आहे,' असंही राऊत म्हणाले.