तासगाव : “विना सहकार नाही उद्धार” या उक्तीप्रमाणे सहकार क्षेत्राचा विकास करणारे वसंतरावदादा पाटील हे सर्वसामान्यांचे नेते होते, असे उद्गार प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले.
प्रारंभी प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. हुजरे यांनी वसंतदादांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला.
खत कारखाने, सूतगिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली असल्याचे सांगत त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य प्रा.जे.ए. यादव यांनी केले तर आभार कार्यक्रम कमिटी प्रमुख प्रा. आर. बी. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग कोविड १९ चे नियम पाळून उपस्थित होते.