मुंबई : शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण
दिले जाणार नाही, तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी मांडली.
शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची भाजपची मागणी त्यांनी फेटाळून लावली. केवळ राजकारणासाठी अशी मागणी केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्यांचा समावेश
करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुशार भोसले यांनी राज्य
सरकारकडे केली आहे. मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही, असे वर्षां गायकवाड यांनी स्पष्ट केले.
भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. एका धर्माच्या ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला तर, इतर धर्मीयांकडूनही तशी मागणी होईल. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्वाचा समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता येणार नाही. धर्मग्रंथांचे पठन घरात करावे, शालेय शिक्षणात त्यांचा समावेश करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.