महाराष्ट्र ; राज्यात ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या धाड सत्रावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकावर जोरात टीका केली आहे. मंत्र्यांवर आणि सरकारवर होत असलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी प्रत्युत्तर दिले आहे . विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिकांवर केलेल्या कारवाईवरुन पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख न करता सरळ पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे .
“गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी सांगितले होत की, दाऊदला फरफटत आणू. आता त्याच्यामागे फरफटत चाललो आहोत.. ओबामांनी ओसामाच्या नावाने मते मागितली होती का? ओबामांनी निवडणुकीत त्याचा वापर केला होता. ओबामांनी कुणाची वाट नाही बघितली. पाकिस्तान ढगाआडून हेलिकॉप्टर पाठवायचे असा थिल्लरपणा नाही केला. त्यांनी जवान पाठवले आणि लादेनला घरात घुसून मारले. याला म्हणतात मर्दपणा. जसे ओबामांनी ओसामाला मारले , तर तुम्ही दाऊदला मारा. काहीही न करता नुसते , आरोप करता. मी प्रामाणिकपणे सांगतोय की, आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधात आहोत. त्याबद्दल दुमत नाही. मलिकांचा राजीनामा मागत आहात. अफजल गुरूला फाशीला मेहबुबा मुफ्तींनी विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही सत्ता स्थापन केली”, असे जोरदार विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे .
तसेच , एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की, केंद्रीय तपास यंत्रणा एवढ्या पोकळ झाल्या आहेत की, नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबई आणि देशात सगळीकडे फिरतोय आणि चार-पाच वेळा निवडून येतोय. मंत्री बनतोय आणि केंद्रातील यंत्रणांना माहितीच नाही. केंद्राच्या यंत्रणा मग करतायंत काय? नुसतं थाळ्या वाजवायचं, दिवे पेटवायचं काम करायचं का? दिवे लावतात, तर दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना कोणती माणसं दाऊदची आहेत. देवेंद्र फडणवीसांना केंद्राने रॉ, सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे काम अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती तुम्ही ईडीकडे दिली. त्यामुळे काम आणखी वेगाने होईल. माहिती देणारे, आरोप करणारे, चौकशी करणारे सर्व तुम्हीच आहात. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सगळ्या यंत्रणा अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच कळत नाहीये”, असा जोरदार टोला लगावत ठाकरेंनी फडणवीसांना प्रशन विचारला आहे .