महाराष्ट्र: राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सतत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीने उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्पक ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे ११ फ्लॅट सील केले आहेत.
“हे आज ना उद्या होणारच होते. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर असे छापे पडत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. ईडीने छापा टाकून प्रॉपर्टी जप्त केली असेल तर सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पैसे मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता मातोश्रीने लोकांना उत्तर द्यावे. सचिन वाझेकडील पैसे कुठे फिरायचे हे आता बाहेर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता घरात लपून राहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे,” अशी जोरदार प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.