मुंबई : राज्यात सध्या ईडीच्या कारवाईचा धडका सुरू आहे. यावरून भाजप महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. तर महाविकास आघाडी या कारवाईवर पक्षपाताची टीका करत आहे. शुक्रवारी मलिकांच्या राजीनाम्यावरून आणि भ्रष्टाचारावरून फडणवीसांनी हल्लाबोल केला. तर आज फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे. मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. मलिकांचा राजीनामा तथ्य असेल तर करू ना. पण आरोपात तथ्य तर पाहिजे. एखादा नेता चार पाचवेळा निवडून येतो. मंत्री बनतो, तरी केंद्राच्या यंत्रणांना माहीत नाही पोकळ यंत्रणा झाल्या का? टाळ्या वाजवा थाळ्या वाजवा, दिवे लावा एवढेच करतात का एजन्सी? या एजन्सी म्हणजे बाण आहे. हातात घ्यायचे आणि लक्ष्यावर मारायचे असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच केंद्राने तुम्हाला रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. ईडीला तुम्हीच माहिती दिली. असे वाचले मी ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही. असे म्हणत त्यांनी फडणवीसांना ही टोला लगावला.
सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि देशमुखांच्या मांडीला मांडी लावून बसला असता की नाही? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पाहटेच्या शपथविधीचाही पुन्हा समाचार घेतला. तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहात ही नीच विकृत आणि निंदणीय गोष्ट आहे. मर्द असेल तर अंगावर या, बघतो तू आहे आणि मी आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. मागे गडकरी म्हणाले आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. तुमच्याकडे ह्यूमन लॉन्ड्रिंग सुरू केले का? म्हैसूर साबण लावायचा बघा झाला स्वच्छ हे सर्व होते असे समजू नका की कोण बघत नाही. आपला पिता धृतराष्ट्र होता. तसा हा धृतराष्ट नाहीये. हा महाराष्ट्र आहे. अशा वाटेला जाऊ नका. यातून कोणाचे भले होत नाही. मी घाबरलोय म्हणून मी बोलत नाही. ही संधी आहे. असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.