महाराष्ट्र: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या खूप चर्चेत आहेत. सध्या त्यांनी काँग्रेसबद्दल केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरला आहे. गडकरी म्हणाले की, “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही,” असे जोरदार भाष्य गडकरी यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी म्हणाले की, ‘लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे,’ असेही गडकरी यांनी वक्तव्य केले आहे.
तसेच, ‘काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच. यावेळी त्यांनी भाजपाला संसदेत फक्त २ जागा जिंकता आल्याची आठवणही सांगितली. “पण कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. अशा परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नये,” असेही जोरदार आव्हान गडकरी यांनी केले आहे.