मुंबई: वरळीतील बीडीडी चाळीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात केली आहे. त्यामुळे गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्राचाळीला यापुढे सिद्धार्थ नगर नावाने ओळखले जाईल असेही जाहीर केले गेले आहे. तसेच मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी ३०० एचआयजीची घरे बांधण्यात येणार आहेत. मुंबईतील आमदारांना वगळून ग्रामीण भागातील आमदारांना ही घरे दिली जातील असे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे.
“महाराष्ट्रात ग्रामीण विभागातून आमदार मुंबईत येतात. ते आमदार कुठल्या पक्षाचे आहेत ते महत्त्वाचे नाही पण त्यांच्यासाठीही आपले उत्तरदायित्व असते. आपण सगळ्यांसाठी जबाबदार असतो. त्यामुळे गोरेगाव येथे एका भूखंडावर ३०० खोल्या निर्माण करुन त्या आमदारांना देण्याचा विचार म्हाडाने केला आहे”.
ज्या आमदारांना मुंबई घर नाही किंवा त्यांचे मुंबईत वास्तव्य नाही आणि जे मुंबईतील आमदार नाहीत अशांसाठी ही योजना असणार आहे. मुंबई महानगर क्षेत्राबाहेर राहणाऱ्या सगळ्या आमदारांना मुंबईत घर मिळावे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय मी जाहीर करत आहे. यासाठी जमीन म्हाडाच्या ताब्यात आहे त्यामुळे ३०० आमदारांना घरे देण्याची योजना आखत आहोत,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.