पेट्रोल-डिझेलसोबतच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सुरू असलेल्या वाढीमूळ सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरवाढ सुरु आहे. राज्यात पेट्रोल प्रति लिटर १११ रुपये तर डिझेल ९५ रुपये झाले आहे. याचबरबरोबर घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरची किंमत ९५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या विरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने चूल पेटवून आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ”केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून सतत दरवाढ करत आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आजवरची सर्वात उच्चांकी दरवाढ झाली असून, या सरकारने नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीनंतर ही दरवाढ केली आहे. यातून सरकारची मानसिकता समजून येत आहे. केवळ निवडणूक काळात दरवाढ केली जात नसेल तर सरकारने सतत निवडणुका घ्याव्यात, जेणेकरून नागरिकांना दिलासा तरी मिळेल. तसेच, केंद्र सरकारने जर वाढती महागाई नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.”, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रस्त्यावर चूल पेटवली. तर महिला पदाधिकाऱ्यांनी त्या चुलीवर भाकऱ्या केल्या. याचबरोबर, हाती फलक घेत मोदी सरकारचा निषेध देखील नोंदवला.