सांगली: सांगलीत रोहन नाईक या तरुणाची रंगपंचमीच्या दिवशी हत्या झाली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हा एका हत्या प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत होता. परंतु, बारावी परीक्षा देण्यासाठी तो जामीनावर बाहेर आला होता. जामीनावर बाहेर येताच त्याने हे कृत्य केले आहे. सध्या हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध सुरु आहे.
सांगली शहरात छोट्या वादातून झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बारमध्ये दारू पीत असताना दोन गटात झालेल्या वादातून रोहन नाईक या 21 वर्षीय तरुणाची हत्या झाली होती.
सांगली शहरातल्या एसटी स्टँड रोडवर मंगळवारी रोहन नाईक याची हत्या झाली होती. रोहन हा बारमध्ये दारू पीत असताना, त्या ठिकाणीच दारू पिणाऱ्या काही तरुणांच्या बरोबर किरकोळ वाद झाला. या वादानंतर बारमधून बाहेर पडलेल्या रोहन नाईक याचा पाठलाग करुन सहा ते सात जणांनी रोहन याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने हत्या केली होती. सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला होता.
तसेच, या हत्या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी गतीने तपास करत चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामधील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये साहेबराव किरमल खैरावकर आणि श्रेयस अश्विन शहा या संशयितांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित राज पाटील हा सध्या फरार आहे.
राज हा एका हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात होता. सध्या चालू असलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी त्याला तात्पुरत्या कालावधीसाठी जामीन मिळाला आणि तो कारागृहाबाहेर आला होता. या दरम्यान मित्रांच्यासोबत मिळून राज पाटील याने रोहन याच्यावर हल्ला करत त्याची हत्या केली. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.