महाराष्ट्र: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर म्हणजेच, श्रीधर पाटणकर यांच्यावर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीच्या ठाण्यातील एकूण ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या कारवाईनंतर राज्यात राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया दिसू लागल्या आहेत. यासंबंधित आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतापून जोरदार प्रतिक्रिया दिली असून “ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“ही कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी जिथे जिथे भाजपाची सत्ता नाही, अशा प्रत्येक राज्यात अशा कारवायांना ऊत आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीलाही नोटीस आली आहे”, असे संजय राउत यावेळी म्हणाले आहेत.
“आपण एखाद्या राज्यात निवडणूक हरलो, म्हणून ज्यांनी पराभव केला, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणने ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे. संसदेमध्ये कालच जी माहिती आली, त्यानुसार ईडीच्या सर्वाधिक कारवाया जिथे भाजपाचे सरकार नाही तिथे झाल्या आहेत. यूपीएच्या ११ वर्षांच्या काळात २२ ते २३ कारवाया झाल्या आहेत. मोदींचे सरकार आल्यापासून साधारणपणे २५०० कारवाया झाल्या आहेत. त्यातल्या अनेक कारवाया चुकीच्या असल्याचे नंतर स्पष्ट झाले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा हुकूमशाही पद्धतीनुसार गुलामासारख्या वागवल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे”, असाहि जोरदार आरोप संतापून संजय राऊतांनी यावेळी केला आहे.