आटपाडी : आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यातील सरपंच आंदोलन करणार असून याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून गटविकास अधिकारी मनोज भोसले यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या बदली करण्याची प्रामुख्याने मागणी करण्यात आली आहे.
दिघंचीचे सरपंच मोरे यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले असून यामध्ये तालुक्यातील ग्रामीण विकास कामांना खिळ घातलेल्या गटविकास अधिकारी मनोज भोसले यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आटपाडी पंचायत समिती गटात वर्षानुवर्षे दुष्काळ होता परंतु अलीकडच्या काळामध्ये पाऊस चांगला पडत आहे व टेंभू योजनेचे पाणी आल्याने तालुक्यातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत व विकास कामाबाबतच्या मागण्या ग्रामपंचायतकडे वाढल्या आहेत. परंतु गटविकास अधिकारी मनोज भोसले यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यांच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराचा फटका आटपाडी तालुक्यातील विकास कामांना बसला आहे. भ्रष्ट अधिकारी मनोज भोसले यांचे काही कारनामे ज्यामुळे नागरिकांना व ग्रामपंचायत पदाधिकारी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामध्ये विनाकारण फक्त पैशाच्या हव्यासापोटी घरकुल चे हप्ते न सोडणे व वारंवार घरकुल च्या हप्त्यासाठी हेलपाटे मारायला लावणे.प्रधानमंत्री आवास प्लस ड यादी पात्र अपात्र लाभार्थ्यांची निवड केलेली आहे त्यामधील तत्काळ गरजू लाभार्थ्यांना PRIORTY ने पहिल्यांदा लाभ देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील इतर गावात गरजूवंत लाभार्थाना online लिस्ट न बघता लाभार्थ्यांची निवड करून लाभ दिला आहे. परंतु तालुक्यातील काही ग्रामपंचायत साठीच हा नियम लावला आहे. नवीन रोजगार हमी योजनेच्या कामाच्या मंजुरीसाठी पैशाची मागणी करणे. कोणतेही कारण नसताना रोजगार हमीच्या कामाची फाईल पेंडिंग ठेवणे. नवीन विहिरीच्या कामांना मंजुरी न देणे तसेच नवीन प्रस्तावासाठी चुकीची माहिती सांगून वेळ मारून नेणे व पैशाची मागणी करणे. ठराविक ग्रामपंचायतची कामे प्रलंबित ठेवून राजकीय भूमिका वठवणे. बिहार पॅटर्न साठी ची कामे फक्त ठराविक ग्रामपंचायत ची मंजूर करणे. मिटिंग च्या नावाखाली ग्रामसेवकांना पंचायत समिती मध्ये थांबवून ठेवणे. कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करणे.व तडजोड झालेली कामे मार्गी लावणे व बाकीची कामे प्रलंबित ठेवणे.आर्थिक तडजोड करणाऱ्या ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना सुट देणे व बाकी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना कात्रीत पकडणे व मानसिक त्रास देणे. प्रत्येक कामात पैशाची अपेक्षा ठेऊन कामे करणे. आर्थिक फायदा होत नसेल कामे प्रलंबित ठेवणे व नाकारणे.कोणत्याही कामासाठी कमीत कमी 20 हेलपाटे मारायला लावणे ही मनोविकृती अशा अनेक नाना-विविध तक्रारी संपूर्ण आटपाडी तालुक्यामधून होत आहेत.
त्यामुळे या तक्रारी ची दाखल घ्यावी व गटविकास अधिकारी मनोज भोसले यांची तात्काळ खाते निहाय चौकशीचे आदेश द्यावेत व त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची आटपाडी तालुक्यातून बदली करावी अन्यथा तालुक्यातील दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, उपसरपंच तेजश्री मोरे, लिंगीवरे सरपंच विराज पुजारी, पुजारवाडी दिघंची सरपंच अनिता व्हनमाने, पळसखेलच्या सरपंच कौशल्य कुचेकर, उंबरगाव सरपंच शिवाजी कुचेकर,पूजारवाडी आटपाडी सरपंच मंगल मोटे, राजेवाडीचे सरपंच पांडुरंग कोडलकर, गळवेवाडीच्या सरपंच सुरेखा पाटील, खानजोडवाडी सरपंच रामदास सूर्यवंशी, गोमेवाडी सरपंच नंदकुमार दबडे यांच्यासह उपसरपंच, सदस्य हे सांगली जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसणार आहेत.
निवेदनाच्या प्रती ग्रामविकासमंत्रीसो, महाराष्ट्र राज्य, आमदार अनिलभाऊ बाबर, विभागीय आयुक्तसो, पुणे यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील सरपंच व गटविकास अधिकारी यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.