राजस्थान: राजस्थानचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी आज वाढणारी महागाई आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या नैतिक मूल्यांचा पुन्हा विचार करत असताना काँग्रेस मरेल पण देशावरील अत्याचार सहन करणार नाही असे जोरदार विधान केले आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ ते म्हणाले कि, “देशातील परिस्थिती ठीक नाही. महागाई शिगेला पोहोचली आहे. यापूर्वी भाजप सरकारने गॅस सिलिंडरचे दर १०० ते १५० रुपये आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी केले होते. जोपर्यंत निवडणुका झाल्या, तोपर्यंत लोकांना मूर्ख बनवून निवडणुका जिंकल्या. आता किंमती वाढत आहेत.”
त्याचबरोबर, महागाई अशीच वाढत राहिली तर लोक मोटारसायकल, कार वापरणे बंद करतील, तसेच, भाजपचे नेते खोट्याचे आणि फसवणुकीचे राजकारण करतात. त्यांनी देशाचा विश्वासघात केला आहे. निवडणुकीनंतर सरकारने इंधन आणि गॅसच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस मरेल पण देशावर होणारे अत्याचार सहन करणार नाही.
मोदी सरकारने महागाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यांचे काम फक्त धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे आहे. हिंदू आणि मुस्लीम वाद घडवून आणून ते मते मिळवतात. पण ते नोकऱ्या आणि अन्नाबद्दल बोलत नाहीत, असेही जोरदार वक्तव्य त्यांनी केले आहे.