गुजरात: न्यायालये ही सामान्यपणे कायद्याच्या भाषेत आणि पुराव्यांवरच विश्वास ठेवणारी असतात, त्यानुसारच चालतात आणि त्यानुसारच चालायला हवीत अशी सर्वमान्य अपेक्षा असते. परंतु, अनेकदा न्यायामूर्ती या चौकटीच्या बाहेर जाऊन एक माणूस म्हणून देखील भूमिका मांडताना दिसतात. अशाच प्रकारची एक भूमिका गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जमशेद पारदीवाला यांनी मांडली आहे. काल संध्याकाळी अहमदाबाद पारसी पंचायतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
“आजपर्यंतच्या इतिहासात दोन भयानक वर्ष कुठली असतील, तर ती नक्कीच २०२० आणि २०२१ असतील. या काळात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. या दोन वर्षांनी आपल्याला खूप काही शिकवले आहे. आपले नातेसंबंध, काम आणि नीतीमूल्यांविषयी शिकवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या दोन वर्षांनी आपल्याला आठवण करून दिली आहे की आपण माणूस आहोत आणि आपल्याला देवाची गरज आहे”, असे न्यायमूर्ती पारदीवाला म्हणाले आहेत.
तसेच, “माझ्यामते, या कठीण काळात देखील आपल्याला समर्थ ठेवणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे श्रद्धा आणि आशा. श्रद्धेमध्ये लोकांना त्यांच्या जीवनाचे कारण सापडले आणि आशेमध्ये कोणत्याही संकटाचा लढण्याचे धैर्य लोकांना मिळाले”, असेहि त्यांनी कार्यक्रमात भाष्य केले आहे.