आटपाडी: आज २२ मार्च म्हणजेच ‘जागतिक जल दिन’ आहे. मानवी शरीराचा ६० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे, तरी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासोबतच, पाणी पिण्याचे अनेक अनेक फायदे आहेत. प्रचंड गरमीमुळे खूप घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा परीस्थितीत शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. दररोज कमीतकमी २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते.
मिळालेल्या माहितीनुसार, सांधे आणि पाठीचा कण्यामध्ये आढळणारे कार्टिलेजमध्ये ८० टक्के पाणी असते. दीर्घकालीन डिहायड्रेशनमुळे सांध्यांची वेदना शोषून घेण्याची क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. म्हणूनच दररोज पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे.
रक्तामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते आणि शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑक्सिजन पोहचवण्याचे काम रक्त करते. अशात शरीरातील पाण्याची पातळी खालावल्यास ऑक्सिजनचा पुरवठा बाधित होतो.त्यामुळे, पाणी प्यायल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते.
जेव्हा तुम्ही दररोज २ ते ३ लिटर पाणी पिता तेव्हा याचा फायदा त्वचेला आणि केसांना होतो. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते. जर शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. यामध्ये त्वचेचे विकार, कमी वयात सुरकुत्या पडणे, म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात.
तसेच, नियमित पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होते. जर प्रत्येक दिवशी ८ ते १० ग्लास पाणी पित असाल तर तुम्हाला आपले पोट भरलेले वाटेल. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात अन्न ग्रहण करणार नाहीत.त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास जेवणाच्या आधी पाणी पिणे आयांत योग्य प्रमाणात ठरू शकते.
त्याचप्रमाणे, शरीरामध्ये अनेक प्रकारचे विषारी पदार्थ जमा होत असतात, ज्यांना वेळच्यावेळी शरीरातून बाहेर काढणे गरजेचे असते. शरीरातून मल आणि मूत्र बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. घाम येण्याच्या प्रक्रियेतही पाण्याची गरज असते.
अपुरे पाणी पिल्याने किडनी स्टोन आणि तसेच, इतर समस्या उद्भवू शकतात. आणि रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवू शकते.