आटपाडी: दात किडलेले असणे, हिरडय़ांचे आजार अथवा गंभीर विकारांमुळेही श्वासाला दुर्गंधी येते. श्वास आपल्या वैयक्तिक स्वच्छतेचा तसेच आरोग्याचा निदर्शक आहे. परंतु कधी कधी आपल्या नकळत आपण असे अन्नसेवन करतो, की त्यामुळे आपल्या श्वासाला दुर्गंधी येते.
आपले दंतारोग्य चांगले राखल्यास आपला श्वास चांगला राहतोच. कांदा आणि लसूण खाल्ल्याने आपल्या श्वासाद्वारे वास बाहेर पडतो. त्यात मोठय़ा प्रमाणात गंधक असते. त्यामुळे पोटात गेल्यानंतरही श्वासावाटे त्यांचा गंध बाहेर पडतो. गंधक आपल्या रक्तात मिसळून रक्ताभिसरणाद्वारे श्वासापर्यंत त्याचे अस्तित्व राहते.
तसेच, चीज खाल्ल्यानंतरही श्वास उग्र होतो. कारण चीजमध्ये ‘अमायनो आम्ल’ असतात. आपल्या तोंडातील जिवाणूंशी त्यांचा संयोग होऊन गंधकनिर्मिती होते. त्यातून हायड्रोजन सल्फाईड तयार होते. ते दुर्गंधी असते.
त्याचप्रमाणे,कॉफी व मद्यामुळेही तोंडाला दुर्गंध येतो. या द्रव्यांमुळे तोंड कोरडे पडते. त्यामुळे दुर्गंधी निर्माण करणारे जिवाणू मोठय़ा प्रमाणावर तोंडात निर्माण होतात. मद्याचे अस्तित्व शरीरात दीर्घकाळ रहात असल्यानेही श्वासाला दुर्गंधी येते. साखरेच्या प्रमाणाबाहेर सेवनानेही श्वासाला दुर्गंध येतो. कारण त्यामुळे आपल्या तोंडात यीस्ट वाढते. त्यामुळे दातही खराब होतात.
यासाठी, ‘ग्रीन टी’मुळे तोंडातील विषद्रव्ये नष्ट होतात. त्याच्यात असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे श्वासाचा दुर्गंध दूर होतो. यामुळे तोंडात ओलावा रहात असल्यानेही श्वास दुर्गंधित होत नाही. पुदिन्याची पाने आणि ओव्यामुळेही श्वास चांगला राहतो.व श्वासाला दुर्गंध येत नाही.