आटपाडी: उन्हाळा दिवसेंदिवस कडक होत चालला आहे. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करणारे अंगरखे, वेशभूषा परिधान करणे गरजेचे आहेच. तसेच या वाढत्या तापमानात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात निर्जलीकरण, उष्माघात, उष्म्याने पेटके येणे, थकव्यासह त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
या काळात त्वचेची सफाई, त्वचा कोरडी पडू न देणे, त्यावर उन्हापासून बचाव करणारे ‘सनस्क्रीन लोशन’ लावणे गरजेचे आहे. यासह त्वचा सुरकुत्या-पुरळांपासून दूर ठेवण्यासाठी व निरोगी-तजेलदार राखण्यासाठी आहारातही काही बदल गरजेचा असल्याचे सांगितले जात आहे. बदलत्या हवामानानुसार योग्य आहार आणि त्यात काही हवामानुकूल बदल करावा.
आहारतज्ज्ञाच्या मते, जीवनसत्त्वयुक्त आहार विषद्रव्य निर्मूलन करणारे (अॅण्टीऑक्सिडंट) अन्नघटक आपण घेतले पाहिजेत. आपले शरीर बाहेरील तापमानानुसार आपल्या तापमानाचे संतुलन करत असते. बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी प्रत्येकाचे शरीर चयापचय क्रियेत बदलही करते. व्यक्तिनिहाय हा बदल कमी-अधिक असतो. त्यामुळेच आहारातील बदल गरजेचा असल्याचे आहारतज्ज्ञाचे मत आहे. या काळात शरीरातील पाणी झपाटय़ाने कमी होते. शरीरातील द्रवपदार्थ, सोडियम घटते. त्यामुळे थकवा, पेटके येण्यासारखा त्रास जाणवतो.
तसेच, उन्हाळय़ात आंबे, कलिंगड खरबूज खावे. आंब्यात अ जीवनसत्त्व व ‘बीटा कॅरोटीन’ असते. कलिंगड -खरबुजांत जीवनसत्त्वांसह विषद्रव्य विरोधी घटक आणि त्याचबरोबर पाणी असते. या काळात पाण्याची गरज भागवताना पॅकबंद पेय किंवा कृत्रिम थंडपेय टाळावे. त्यात साखरेचे व कृत्रिम संरक्षक घटक असतात. त्याऐवजी साधे िलबू सरबत, लस्सी, ताक, दही, नारळपाणी, कोकमसारखी पेय प्यावीत. त्याने उन्हाळय़ात झपाटय़ाने कमी होणारा शरीरातील सोडियम, पोटॅशियम स्तर राखण्यास मदत होते. तसेच शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते व त्यामुळे आपली त्वचाही तजेलदार राहते. तसेच सातूच्या पिठाचा उन्हाळय़ात वापर करावा. त्यामुळेही शरीराला थंडावा लाभतो. सातूच्या पिठातील प्रथिनांमुळे त्वचा सुरकुतण्याची प्रक्रिया संथ होते व ती तरुण आणि तजेलदार बनते, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले.