महाराष्ट्र: राज्यातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पुन्हा एकदा तापमानाचा पारा जोरदार वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवारपासून म्हणजेच २८ मार्चपासून राज्यभरातील वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यभरातील खूप शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
तसेच, गेल्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. परिणामी राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढल्याने कमाल तापामानात थोडी घट झाली होती.
परंतु, आज शनिवारी एकच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, कोकणात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. उरलेल्या राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.