मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोनाचे सर्वच निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे दोन नियम सोडले की सर्व नियम शिथील करण्याचे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.
२४ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा, केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार वेळोवेळी बदलही केले होते.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या २४ महिन्यांत जागतिक महामारीच्या व्यवस्थापनानुसार रोगाचे निदान लावणे, उपचार करणे, लसीकरण करणे रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे यावर भर देण्यात आला. याचबरोबर सामान्य जनता कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी सक्षम झाली आहे. ते पुढे म्हणाले की, मागील दोन महिन्यात नवीन कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. याचबरोबर या महामारीचा देशातील राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपली सर्व क्षमता पणाला लावत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्याचबरोबर ज्या त्या परिस्थितीनुसार राज्यानी कोरोनाच्या नियमांत बदल केल्याचेही भल्ला यांनी सांगितले.
भल्ला यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कोरोनाच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या देशात लागू करण्यात आलेल्या नियमांची तारीख ३१ मार्च रोजी संपत आहे त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणताही आदेश जारी केला जाणार नाही.