ठाणे : महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट लागू झालेली आहे. लोकप्रतिनिधी हे नेहमीच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतात. ठाणेकरांच्या मागणीसाठी आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेतली. या भेटीत महिला व बालकल्याण समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निश्चित केलेल्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. परंतु गरजू असलेल्या कोणत्याही अर्जदाराला अनुदानापासून वंचित न ठेवता सर्वांना या योजनांचा फायदा देण्याची मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्तांना दिले. आयुक्तांनी शिष्टमंडळाची मागणी मान्य केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाचे प्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. 24 हजार नागरिकांना या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे .
यासाठी प्रशासनावर जवळजवळ 12 कोटीचा बोजा महापालिकेवर पडणार आहे, पण या योजनांचा लाभ निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती व समाजातील उपेक्षित किन्नर नागरिकांना देखील होणार आहे .या योजनांसाठी वाढीव तरतूद केल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे आभार व्यक्त केले जात आहे. या योजनेमधून एकूण 14 हजार 854 नागरिकांना लाभ मिळणार होता,पण शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे यासाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जाचा विचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने मांडली. त्यामुळे आता एकूण 24 हजार नागरिकांना या विविध योजनांचा लाभ मिळणार असून सदर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँकखात्यात जमा होणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.
तसेच ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागली असल्याने महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालये प्रशासनाकडून सील केली आहेत.