नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे की भारतात विकल्या जाणार्या सर्व नवीन कारमध्ये लवकरच नव्या मापदंडानुसार सहा एअरबॅग असतील. जानेवारीमध्ये, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 8 लोकांच्या प्रवासी क्षमतेच्या कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यासाठीच्या मसुदा अधिसूचनेला मंजुरी दिली. अलीकडील घोषणेमध्ये योजनेची वेळ मर्यादा स्पष्ट करण्यात आली नाही, परंतु मसुदा अधिसूचनेत असे म्हटले आहे की 1 ऑक्टोबर 2022 पासून नव्या कारमध्ये अपडेटेड सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल.
14 जानेवारी 2022 च्या मसुद्याच्या अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर 2022 नंतर बनवल्या जाणाऱ्या M1 श्रेणीतील वाहनांमध्ये दोन फ्रंट साइड एअरबॅग्ज आणि दोन कर्टेन एअरबॅग्ज बसवल्या जातील.
अलीकडेपर्यंत, ऑटोमोटिव्ह सुरक्षिततेसाठी भारतातील नियम व मापदंड सर्वोत्तम नव्हती. ड्रायव्हर-साइड एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये 1 एप्रिल 2019 पासून अनिवार्य करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2022 पासून प्रवाशांना एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या.अतिरिक्त एअरबॅग्जमुळे कार अधिक सुरक्षित होतील, असा सरकारचा विश्वास आहे.
परंतु, अतिरिक्त एअरबॅग्जमुळे कारच्या किमतीत किमान 50,000 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, ज्या कारमध्ये साइड आणि कर्टन एअरबॅग्ज दिले जात नाही. त्या कंपण्यांना एअरबॅग सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे ठेवण्यासाठी कारच्या बॉडीमध्ये तसेच आतील डिझाईनमध्ये अनेक बदल करावे लागतील. यामुळे गाड्यांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.