म्हसवड/अहमद मुल्ला : लातुर-सातारा या महामार्गावरील म्हसवड ते दहिवडी दरम्यानच्या रस्त्यावर काम गेली काही वर्षे रखडले असुन रस्त्यावर अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गामधून होत आहे.
गेली सहा वर्षे या रस्त्यावर काम सुरु होते. सुरूवातीचा कामाचा धडाका पाहता हे काम दोन वर्षातच पूर्ण होईल असे वाटत होते. पण सहा वर्षे झाली तरी या रस्त्यावर काम पूर्ण झाले नाही. गेले वर्षभर कामच बंद ठेवल्याने यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्यावर म्हसवड शेजारील माणगंगा नदीवरील पुल, पंत वस्ती जवळील रस्ता, करंज ओढ्यावरील पुल, दिवड गावच्या हद्दीतील रस्त्याचा काही भाग, मणकर्णवाडी, पळशी हद्दीतील नियोजीत टोल नाक्याचा भाग, गोंदवले जवळील ओढ्यावरील अपूर्ण अवस्थेतील पुल, गोंदवले गावातील रस्ता तसेच मायणी चौकाजवळील एस टाईप वळण या भागाचे काम पूर्ण होणे बाकी आहे. या एस टाईप वळणावर अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत ते वळण काढणे गरजेचे आहे.
म्हसवड जवळील पुलावर तर साईडला पत्रा लावून ठेवला आहे. पोळ पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरील दुभाजकाच्या सुरुवातीला कोणताही फलक लावण्यात आला नाही. रात्रीच्या वेळी हा दुभाजक लक्षात न आल्याने या ठिकाणी अपघात होऊन एक बळी गेला आहे. माणगंगा नदीवरील पुल ते म्हसवड शहर दरम्यानच्या रस्त्यावर काम व्यवस्थित न केल्याने खड्यांचे जाळे झाले आहे. या रस्ताच्या दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.