मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान पहिल्या दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते आणि आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महाविकास आघाडीतील नेते, मंत्री आणि आमदारांवर सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जातेय. आयकर विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरही धाड टाकली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सभागृहात भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘मी तुमच्यासोबत येतो. सत्तेसाठी येत नाही. याच्यावर टाच मार, त्याच्यावर टाच मार, कुटुंबीयांवर धाडी टाक हे जे काही तुम्ही जे चाळे केले आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात’, असे खुले आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिले. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. ‘जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो’, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, ‘जेव्हा कोणतेही उत्तर नसते तेव्हा भावनेचा आधार घेतला जातो. भाजपने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली. त्याचे कोणतेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. म्हणून भावनिक भाषण केले, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे असे आव्हानही फडणवीसांनी दिले.
किरीट सोमय्या यांची कारवाई ही प्रतिकात्मक आहे. कुठलिही कारवाई ही संबंधित संस्था किंवा न्यायालय करते. भाजपची संघर्षाची भूमिका आहे. आम्ही कुठल्याही कारवाईने दबणार नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलतच राहणार, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. कुणाला कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचे नाही किंवा कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रश्नच नाही. कुठलीही संस्था कुणाचा नातेवाईक पाहून कारवाई करत नाही. तथ्यांच्या आधारावरच कारवाई होते, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिले.