मुंबई : चीन, कोरिया इत्यादी देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आपल्याकडे सर्तकता बाळगण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. यामध्ये इनफ्लुएन्झा किंवा अन्य श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांच्या करोना चाचण्या करण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राज्यात सध्या रुग्णसंख्येत वेगाने घट होत असून तिसरी लाटही पूर्णपणे ओसरली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही हजारांच्या खाली गेली असून दोन वर्षांनंतर प्रथमच इतकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु तरीही दुर्लक्ष न करता नव्याने आढळणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच संसर्ग प्रसार वाढू नये यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाईल याकडे लक्ष देण्याचे या पत्रकात नमूद केले आहे. इन्फ्लुएन्झा किंवा श्वसनाच्या आजाराची लक्षणे ही करोना सारखीच असतात. त्यामुळे या रुग्णांच्या करोना चाचण्या करून घ्याव्यात .ज्यामुळे, रुग्णांचे वेळत निदान केले जाईल, असेही यामध्ये सूचित केले आहे.