नवी मुंबई : हापूस आंब्याच्या बाजारात विक्री स्पर्धा सुरू झाल्या आहेत. हापूस आंब्याचे किरकोळ बाजारातील आगमन जानेवारीपासून सुरू झाले आहे परंतु, कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाचे नैर्सगिक आगमन हे गुढीपाडव्यापासून करण्याची जुनी परंपरा असून गुढीपाडव्याला विधिवत हापूस आंबा झाडावरून उतरवून त्याचा देवाला नैवेद्य दाखवतात व तो बाजारात विक्रीसाठी काही शेतकरी पाठवतात.
कोकणात हापूस आंब्याचा यंदा मोहर चांगला आला आहे पण जास्त प्रमाणात थंडी व अवकाळी पावसामुळे या मोहराचे फळात रुपांतर कमी झाले आहे, तरीही यंदा हापूस आंब्याचे उत्पादन मागील वर्षांपेक्षा जास्त आहे.अशी माहिती आहे. जानेवारीपासून हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या दिवसाला वीस ते पंचवीस हजार हापूस आंब्याच्या पेटया घाऊक बाजारात येत आहेत. गुढीपाडव्यापासून आंब्याच्या आवकमध्ये वाढ होणार आहे. कोकणातील आंबा बागातयदार हापूस आंबा याच दिवशी मुंबई पुण्याच्या घाऊक बाजारात पाठविण्याची पद्धत आहे
.
चाळीसपन्नास वर्षांपूर्वी हा आंबा बोटीतून मुंबईत येत होता पण आता वाहतूक व्यवस्था सुरु झाल्याने कोकणातील तीन जिल्ह्य़ातून हापूस आंबा मुंबईच्या घाऊक बाजारात येणार आहे. हंगामातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या या हापूस आंब्याचे पूजन गुढीपाडव्याच्या शुभ मुर्तावर केले जाणार आहे.