नाशिक : मुंबईमधून निघालेल्या पवन एक्स्प्रेसचे ११ डबे रविवारी दुपारी तीनच्या वेळेस देवळाली-लहवीतदरम्यान घसरली आहे. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले असले तरी रेल्वेने त्यास दुजोरा दिलेला नाही. अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत . या अपघातामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे .
एलटीटी- जयनगर पवन एक्स्प्रेस इगतपुरीकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाला आहे . लहवीतजवळ रेल्वेमार्ग उखडून एकामागोमाग एक डबे घसरले. त्यांची चाके जमिनीत रुतली.अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटलेली नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले. पुष्पो महंतो, मुकेश महंतो, सरोज मिश्रा आणि लखीमचंद हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे .
अपघातग्रस्त गाडीत १२०० प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे . जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . स्थानिकांनी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती . त्यांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन आणि मनपा शहर बससेवेच्या गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.लगतची दुसरी मार्गिका सुमारे ५०० मीटर अंतरावर असल्याने अपघातात ती बाधित झाली नाही. अपघातात रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे . इगतपुरी, मनमाड व भुसावळ स्थानकाहून रेल्वेचे आपत्कालीन साहाय्यता पथक, वैद्यकीय पथक, क्रेनसह अपघातस्थळी दाखल झाले होते.अपघातग्रस्त रेल्वे रुळावर घेणे आणि रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान आठ ते १० तास लागण्याची शक्यता व्यक्त केले आहे .