रोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम केल्यास नैराश्याचा सामना करता येऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. व्यायाम केल्यानंतर रक्ताभिसरण वेगाने होते. श्वासोच्छवासाची गती वाढल्याने व्यक्ती अधिक ऑक्सिजन घेतो. त्यामुळे आपल्याला नैराश्य आणणाऱ्या मेंदूतील जैव-रासायनिक घटकांवर त्याचा परिणाम होतो व निराशा सौम्य होण्यास मदत होते. आयोवा विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या अभ्यासाचे हे निष्कर्ष आहेत.
हा अभ्यास करण्यासाठी नैराश्याचा सामना करणाऱ्या ३० प्रौढ व्यक्तींना निवडण्यात आले. सहभागी व्यक्तींना अर्धा तास सायकिलिंग करण्यास सांगण्यात आले. सायकिलिंग आधी, सायकिलिंग अर्ध्यावर आलेले असताना आणि सायकिलिंगनंतर त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर २५, ५०, ७५ मिनिटांनी त्यांना सर्वेक्षणांतर्गत प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांच्या निराशेची लक्षणे मोजणारे निष्कर्ष लावण्यात आले.
व्यायामानंतर ७५ मिनिटांपर्यंत या व्यक्तींत सुधारणा दिसली. या व्यक्तींमधील निराश भावावस्था, पूर्वी आनंदाने केलेल्या कामांत आनंद न वाटणे, आकलनक्षमता घटणे या निराशाग्रस्त रुग्णांतील प्रमुख लक्षणांकडे लक्ष ठेवले गेले. यावरून असे आढळून आले, की अर्धा तास सायकिलगचा व्यायाम करणाऱ्या रुग्णांत पुढील ७५ मिनिटे लक्षणीय सुधारणा दिसून आली. ज्यांना कामात आनंद वाटत नव्हता अशा रुग्णांमध्ये व्यायामानंतर ७५ मिनिटे सुधारणा दिसल्यानंतर पुन्हा तशी अवस्था येऊ लागली. परंतु ज्या गटाने अजिबात व्यायाम केला नव्हता, त्यापेक्षा व्यायाम करणाऱ्या गटातील रुग्णांची सुधारलेली दिसली.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, , की ही अल्पावधीसाठी राहिलेली सुधारणा किती काळ टिकू शकते, याबाबत अद्याप निष्कर्ष काढता येत नाहीत.
परंतु, व्यायामानंतर ७५ मिनिटे निराशाग्रस्त रुग्णांत सुधारणा दिसते. त्यानंतरही व्यायाम न करणाऱ्या रुग्णांपेक्षा त्यांच्यात चांगली सुधारणा दिसते. आठवडाभराच्या या अभ्यासात ज्या गटाने व्यायाम केला आहे त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांच्या निराशाग्रस्ततेची लक्षणे कमी झालेली दिसली. व्यायाम करणाऱ्या रुग्णांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांना लाडेच प्रतिसाद दिला. त्यांच्याशी चांगला संवाद साधला. निराशेचा सामना करणाऱ्या रुग्णांना भावनिक आव्हानात्मक कामे देणारी संज्ञानात्मक वर्तन चाचण्यांच्या तुलनेत व्यायामामुळे मेंदूला चांगली चालना मिळते व रुग्णांत सुधारणा दिसते. व्यायामोपचार हा निराशाग्रस्त रुग्णांवर औषधोपचारापेक्षा जास्त परिणामकारक ठरतो.मात्र औषधाप्रमाणे त्याचे लगेच परिणाम दिसत नाहीत. व्यायामाने सुधारणेला थोडा काळ लागतो पण इतरही लाभ होऊन निरोगी राहण्यासही खूप मदत होते.