मुंबई : उत्तर भारतीयांचा अपमान केला म्हणून, बीजेपी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. त्यांनी अयोध्येत येण्यापूर्वीच उत्तर भारतीयांची माफी मागावी. नाहीतर त्यांना अयोध्यात घुसू दिले जाणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना दिल्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यात उडी घेत त्यांच्यावर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना धोका दिला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना नाही. त्याचबरोबर उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्यात जाण्याचा अधिकार नाही. उत्तर भारतीयांविरोधात मुंबईत आंदोलन केले. त्यांना आम्ही येथून घालून देऊ अशी भूमिका घेतली, त्या राज ठाकरेंना आम्ही अयोध्येत येऊच देणार नाही, अशी जी भूमिका भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मांडलेले आहे. त्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगत, उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना युपीमध्ये जाण्याचा अधिकार नाही, असा टोला रामदास आठवले यांनी राज यांना लगावला आहे.