केरळ: देशात मंगळवारी दिवसभरात २ हजार ८९७ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ५४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान २ हजार ९८६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.६१ टक्के नोंदवण्यात आला. मंगळवारी दिवसभरात झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४८ मृत्यूंची नोंद केरळमध्ये झाली आहे.
केरळपाठोपाठ महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रत्येकी २, हिमाचल प्रदेश, राजस्थान तसेच उत्तर प्रदेशात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूपैकी ७० टक्के मृत्यू सहव्याधी ग्रस्त कोरोनाबाधितांचे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी ३१ लाख १० हजार ५८६ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २५ लाख ६६ हजार ९३५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १९ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार १५७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या सार्वत्रिक लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९० कोटी ६७ लाख ५० हजार ६३१ डोस लावण्यात आले आहेत. यातील ३.०९ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १८ कोटी १ लाख ३ हजार ३४५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी १९ लाख ८६ हजार ८९१ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ७२ हजार १९० तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएआरकडून देण्यात आली आहे.