कडक उन्हाळा तापत असल्यामुळे राज्यात पिण्याचा पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस परिसरात चाराटंचाई भेडसावू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीला काढले आहे. चाराटंचाईमुळे गुराढोरांना पोटभर चारा मिळत नसल्याने मुक्या जनावरांना कसायाच्या दावणीला बांधावे लागत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. कालपर्यंत ज्यांच्या भरोशावर शेती सांभाळली व ज्यांच्यामुळे त्यांना सुखाचे दिवस पाहायला मिळाले, दिवसरात्र ज्यांच्या खांद्यावर धुरा ठेऊन रोजीरोटी कमविली, त्याच गुराढोरांना पोटभर चारा मिळत नसल्याने त्यांचे पालनपोषण कसे करावे? ही समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. गुरांचा चारा व खुराकीचा खर्च झेपत नसल्यामुळे नाइलाजास्तव पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच कडवा-कुटार व गवताची टंचाई भासू लागली आहे. सोयाबिनचे पीक वाया गेल्याने सोयाबिनचे कुटार नाही. थोडेबहुत तुरीचे कुटार होते ते संपण्याच्या मार्गावर आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, अशांनी थोडाफार मका, कडारु पेरला. पण बारनियमनामुळे पाण्याअभावी जास्त प्रमाणात पेरता आला नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांकडे मात्र पर्याय नाही. त्यांच्याकडे असलेला कडबा कुटार संपण्याच्या मार्गावर आहे. बैलांकरिता शिवारात हिरवा चारा नाही. गुरांचा चारा व खुराकीचा खर्च वाढत चालला असल्यामुळे फुकटच दावणीला बांधून त्याच्या चाऱ्याकरिता खर्च करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे बैलबाजारात बैलजोड्यांसह दुधाळ जनावरे गाई, म्हशीही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहे.
मालटेकडी परिसरातील फळबाजाराला लागून जनावरांचा बाजार भरतो. चारा टंचाई, पाणी टंचाईसोबतच दुधाला भाव मिळत नसल्याने जनावरे या बाजारात विक्रीसाठी येतात. मात्र, या बाजारात कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नसल्याने दिवसभर जनावरांसह मालकांना उन्हातच राहावे लागते. जनावरांसाठी पाण्याचीही सोय नाही.
जनावरांचे पालनपोषण कसे करणार
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बैलजोड्या तसेच गुरेढोरे सधअया विक्रीसाठी बैलबाजारात पाहावयास मिळत आहे. शेतकरी बैलजोडी सोबतच दुग्धव्यवसायाकरिता गायी, म्हशी, बकऱ्या सुद्धा पाळतात. उन्हाळ्याच्या दिवसात चारा नसल्याने एवढया जनावरांचे पालनपोषण करणे शेतकऱ्याला अवघड होत आहे.