मुंबई : देशभरात कुटुंबातील किमान एका व्यक्तीला आरोग्य विमा कवच प्राप्त होण्याचे प्रमाण पाच वर्षांमध्ये ११ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र अजूनही हे प्रमाण तुलनेने फार कमी असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत आरोग्य विमा संरक्षण असलेल्या महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे या अहवालात मांडले आहे.
देशभरात कुटुंबातील किमान व्यक्तीला आरोग्य विमा कवच असलेल्या कुटुंबांचे प्रमाण ४१ टक्के आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २९ टक्के होते. १५ ते ४९ वयोगटातील व्यक्तींना आरोग्य विमा संरक्षणाची नोंदणीही या अहवालात केली आहे. यानुसार देशभरात या वयोगटातील ३० टक्के महिलांनाच आरोग्य विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. पुरुषांमध्ये मात्र हे प्रमाण सुमारे ३३ टक्के आहे. मागील अहवालात महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे २० टक्के तर पुरुषांमध्ये सुमारे २३ टक्के होते. गेल्या पाच वर्षांमध्ये महिला आणि पुरुष या दोन्हीच्या विमा संरक्षणामध्ये सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट होते.
महिलांमध्ये ३५ ते ४९ वयोगटामध्ये विमा संरक्षणाचे प्रमाण तुलनेने जास्त असून ३५ वर्षांखालील स्त्रिया आणि मुलींमध्ये विमा संरक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. पुरुषांमध्ये हीच स्थिती असून ५० ते ५४ वयोगटातील पुरुषांमध्ये विमा संरक्षणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे.
राज्य आरोग्य विमा योजनेचे सर्वाधिक लाभार्थी