गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्याने तालुक्यात सुमारे २० हजारहून अधिक हेक्टरवर कांदा लागवड झाली. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. सद्यस्थितीत बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांनी साठवणुकीकडे कल दिला आहे. तर बाजारभाव नसल्याने सरकारने नाफेडमार्फत किमान २० रूपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शेतकरी तोट्यात आले आहे. फळशेती बरोबरच भाजीपाला शेतीही तोट्यात गेले होते.या वर्षी शेतकऱ्यांना पिकास चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा होती. मध्यतंरी एक महिना कांद्यास चांगला बाजार मिळत होता. आता बाजारभाव उतरल्याने तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला प्रथम प्रतिच्या कांद्यास ८०० ते ९००, दोन नंबर कांद्यास सहाशे ते आठशे, तिसऱ्या प्रतिच्या कांद्यास दोनशे ते पाचशेच्या आसपास बाजारभाव मिळत आहे.
शेतकऱ्यांचा कांदा लगवडीचा हेक्टरी सुमारे ६० हजार खर्च होतो. सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे उत्पादन खर्चसुद्धा वसुल होत नाही. त्यामुळे किमान २० रूपये प्रति किलो दराने सरकारने कांदा खरेदी करावा किंवा शेतकऱ्यांना किमान पाच ते १० रूपये प्रतिकिलो अनुदान द्यावी, अशी मागणी करत आहेत.