सोलापूर: सोलापुरात उजनीच्या पाण्यावरुन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप सुरु आहेत. उजनीचे पाणी इंदापुरला पळवल्याचा आरोप भरणे यांच्यावर करण्यात आला आहे, या प्रकरणी आता सोलापुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरु आहे. यावर आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली. उजनी धरणाचे पाणी हे धरणाच्या कार्यक्षेत्रातच आहे. बाहेर कुठेही गेलेले नाही, अशी प्रतिक्रीया धनंजय मुंडे यांनी दिली.
काल सदाभाऊ खोत यांनी सोलापुरातील सभेत उजनीच्या पाण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण उजनीचे पाणी आत्तापर्यंत उजनीच्या कार्यक्षेत्रातच गेले आहे. लवादाने पाण्यावर ज्यांचा हक्क ठरवून दिला. त्या हक्काबाहेर कोणी जाणार नाही.
आज धनंजय मुंडे सोलापूर दौऱ्यावर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावात आज शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. शरद पवार यांना केलेल्या ब्राह्मण संघटनेच्या विरोधावर बोलताना मुंडे म्हणाले, एक संघटना सोडली तर बाकी कोणाचाही विरोध नाही. इतर सर्व संघटना पवार साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन बैठीला येतील, असंही मुंडे म्हणाले.