मुंबई : दाऊदला सोबत घेण्याची भाजपला गरज नाही पण दाऊदच्या परिवारासोबत व्यवहार करणारे नवाब मलिक जेलमध्ये असूनही मंत्रिमंडळात कायम आहेत. दाऊदशी संबंधित लोक मंत्री म्हणून उद्धव यांना कसे चालतात? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. राणे म्हणाले, हाताशी कर्तृत्व नसले, काही मुद्दा नसला की ‘मुंबईचे तुकडे पाडू देणार नाही’ असे भावनिक बोलायचे, कुठे काही जमत नसले की हिंदुत्व, मुंबईवर बोलायचे. हे त्यांचे आजचे नाही, पूर्वापार आहे. फरक एवढाच की मुंबईचे तुकडे होऊ देणार नाही हे आधी ते काँग्रेसकडे पाहून बोलायचे, आज भाजपकडे पाहून बोलतात. तुकडे पाडायला मुंबई म्हणजे भेंडी वा फरस बी आहे का, असा सवाल राणे यांनी केला. मुंबई बॉम्बस्फोटानंतर कोणत्या कामात कोण काय घेत होते, याची माहिती आपल्याजवळ आहे. आजही सत्तेच्या माध्यमातून कोण पैसा घेत आहे; वसुली करतोय याची माहिती आपल्याकडे आहे.
नारायण राणे यांचा सवाल दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात
५/१७/२०२२ ११:०२:०० AM
0
Tags