अकोला: शहरी भागात सर्रास गॅसवर स्वयंपाक होत असला तरी ग्रामीण भागात आजही स्वयंपाकासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होताना दिसत आहे. आता इंधन दरवाढ झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचा ओढा पुन्हा एकदा चुलीकडे वाढला आहे. त्यामुळे अनेक गावातील महिला सरपणासाठी जंगलाकडे धाव घेत आहेत, तर शेण जमा करून गोवऱ्या करीत आहेत.
भारत देश कृषी प्रधान आहे, येथे शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शेतकरी बहुतांश ग्रामीण भागातच आहेत. शहरात जरी तंत्रज्ञानाचा झगमगाट असला तरी ग्रामीण भागात मात्र आजही गोवऱ्यांचा वापर होतो. आजही ग्रामीण भागातील चुली नाहीशा झाल्या नाहीत. फरक एवढाच की चुलीचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र आजही ग्रामीण भागात चुलीचा वापर केला जातो. धावपळीच्या जीवनामध्ये गॅस, शेगडी सारख्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.विज्ञान युगात बऱ्याच परंपरा बदलल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र काही गोष्टी आजही कायम आहेत.
पुन्हा एकदा गोवऱ्यांना भाव
आज सध्या गॅस हजारांवर पोहोचला आहे. परिणामी गॅस सिलेंडर अडगळीत पडले असून पुन्हा चुली बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. स्वयंपाक ,पाणी गरम करण्यासाठी सर्वसमान्यांना आपली चुलच बरी वाटत आहे. आजही चुलीचा ग्रामीण भागात अधिक वापर होताना दिसतो. तसेच पारंपरिक शेगडीसाठी पूर्वीपासून लाकडाचा भुसा, कोळश्याचा चुरा, सरपण यांचाही वापर केला जातो. मात्र तरीही ग्रामीण भागात महिला चुलीसाठी शेणापासून गोवऱ्या तयार करताना दिसतात.