सोलापूर: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या संपानंतर सोलापूर विभागात लालपरीच्या चाकांनी गती घेतली आहे. सुट्टी आणि लग्नसराईमुळे एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. संपानंतर सोलापूर विभागाच्या ९ आगारामधून मागील २६ दिवसात ६० लाख ४१ हजार किलोमीटरचा प्रवास करीत लालपरीने सुमारे १९ कोटी ८१ लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे एसटी ठप्प झाली होती. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. संपापूर्वी दररोज बसच्या १५०० ते १७०० फेऱ्या होत होत्या. मात्र, उन्हाळा सुट्टी आणि लग्नसराई असल्याने यामध्ये वाढ होऊन एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सोलापूर विभागातील ९ आगार प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. एसटीने जास्तीत-जास्त प्रवाशांनी प्रवास करावा आणि उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रवासी मित्र योजना देखील राबविली जात आहे. त्यामुळे आगामी काळात यामध्ये वाढ होईल असा विश्वास देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तब्बल एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या संपानंतर लालपरीने पुन्हा गती घेतली आहे. सध्या ६२५ बसद्वारे दिवसाला २ हजार ३०० फेऱ्या होत आहेत. आगामी काळात यामध्ये वाढ होणार असून, उत्पन्नामध्ये कमालीची वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवाळी सुट्टीत सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर २२ एप्रिलपासून पूर्ण क्षमतेने एसटी धावू लागली. त्यामुळे दिवाळीचा हंगाम पूर्णत: वाया गेल्याने उन्हाळा सुट्टी आणि लग्नसराईमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे.