मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे हिनं सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात आली आहे. याच पोस्टबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी कठीण शब्दांत टीका केली आहे. "अशा लोकांकडे दुर्लक्ष करा. हे सगळे लोक नशेबाज आहेत .
"काही व्यक्ती हिमालयाएवढ्या असतात. काही व्यक्ती सूर्याच्या तेजासारख्या तळपत असतात. सूर्यावर कुणी थुंकलं किवा हिमालयाला कुणी तोंड वेंगाळून दाखवलं तर हिमालय आणि सूर्याचं महत्व काही कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत यांना वेगळ्या प्रकारची नशा कुणीतरी चढवलेली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात असे क्षुद्र किटक वावरत असतात. खिडकी उघडली आणि हवा आली की ते हवेबरोबर उडून जातील", असं संजय राऊत म्हणाले.
"महाराष्ट्रातील, देशातील वातावरणावर आलेलं मळभ, धुकं आणि गढूळपणा हे उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेनं दूर होईल. महाराष्ट्रातील आकाश निरभ्र होईल. या आकाशात भगव्या रंगाचं धनुष्य दिसेल. राज्य आणि शिवसेना पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. काही लोक राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही अडथळे निर्माण करत आहेत. बुस्टर डोस कुणाचा ते माहित नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल. आमची फटकेबाजी असते. प्युअर ब्लास्टर डोस असतो", असं संजय राऊत म्हणाले.