अहमदनगर : राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गट-गणांच्या प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे २३ मेपर्यंत सादर करणार आहेत. विभागीय आयुक्त त्यास ३१ मेपर्यंत मान्यता देतील. या प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी २ जून रोजी प्रसिद्ध करणार आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची संख्या ७५, तर पंचायत समिती गणांची संख्या १४६ होती. लोकसंख्येमध्ये झालेल्या वाढीमुळे गट आणि गणांच्या प्रभागरचनेत बदल होणार आहे. नवीन गट ४२ हजार लोकसंख्येचा राहणार आहे. पंचायत समिती गण २१ हजार लोकसंख्येचा राहणार आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार आता अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट, तर पंचायत समित्यांचे १७० गण झाले आहेत. अकोले आणि पाथर्डी तालुका वगळता अन्य तालुक्यां त एकेक गट, तसेच दोन-दोन गण वाढत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सुधारित सदस्यसंख्येनुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा पुन्हा तयार करण्याचे निर्देश २ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रभागरचनेचे कच्चे आराखडे आयोगास प्राप्त झाले. आयोगस्तरावर त्याची तपासणी सुरू करण्यात आली होती. नंतर निवडणुका लांबणीवर गेल्या. याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर एकत्रित सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
२७ जून रोजी अंतिम रचना
जिल्हाधिकाऱ्यांकडे सूचना २ ते ८ जूनदरम्यान जाहीर करता येतील. विभागीय आयुक्त प्राप्त हरकतींवर २२ जूनपर्यंत निर्णय घेतील. जिल्हाधिकारी २७ जून रोजी अंतिम प्रभागरचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत.