पुणे : राज्याचे पर्यटन धोरण लागू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ३५४ शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या संस्थांनी कृषी पर्यटन केंद्रे सुरू केली आहेत. सर्वाधिक १४३ कृषी पर्यटन केंद्रे पुणे जिल्ह्यात सुरू झाली आहेत. ग्रामीण भागातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात कृषी पर्यटन वाढावे, २०२५ पर्यंत ग्रामीण भागात पर्यटन क्षेत्राद्वारे दहा लाख रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने पर्यटन विभागाने कृषी पर्यटन धोरण २०२० जाहीर केले. या धोरणात खेडेगाव, शेतीक्षेत्र, शेतकरी हे तीन घटक केंद्रस्थानी ठेवून योजना आखण्यात आली. यामध्ये शेतकरी किंवा शेतकरी गट किंवा कृषी विज्ञान केंद्र यांना या योजनेत सहभागी होता येते. ग्रामीण भागातील शेती, माती, संस्कृती, पारंपरिक सण, उत्सव, खेळ, बैलपोळा, बैलगाडी, लोककला, शेतीतील उत्पादने, फळे, पिके, पशुधन यांसह खाण्या-पिण्याची, निवासाची सोय करून पर्यटकांना ग्रामीण संस्कृती, गावगाडा याची भुरळ पाडणे. यातून पर्यटन व रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.