नागपूर –नागपुरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये तब्बल 30 %नी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या प्रेमसंबंधातून होत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही राज्यात सर्वाधिक महिला अत्याचारात नागपूर पुढे असल्याचे दिसून आले आहे.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ६८ गुन्हे पोलिसांनी दाखल करुन घेतले होते. तसेच या वर्षी पाच महिन्यातच 88 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात बलात्कार, विनयभंग, सासरच्या मंडळी कडून अत्याचार यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यांची सर्वाधिक संख्या आहे. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करते. मात्र, तरीही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळं शहरातील महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.