कात्रज: बाह्यवळण मार्गालगत असलेल्या बहुचर्चीत स्मशानभूमीचा प्रश्न गेली १५ वर्षे प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मृत्यूनंतरही आम्हाला मरणयातना भोगाव्या लागत असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेली पंधरा वर्षे केवळ चर्चेत गुऱ्हाळ सुरू असून स्माशानभूमीच्या नावावर केवळ राजकारण चालू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न आधीच चिघळलेला असताना ही स्माशानभूमी रस्त्यालगत असल्याने मोठा अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी अंत्ययात्रा आणल्यानंतर नागरिकांना थांबण्यासाठी किंवा पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवर थांबण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच या मार्गावर अहोरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. अंत्यविधीच्या वेळी नातेवाईंकांना रस्त्यावर थांबावे लागत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडीमुळे छोटे-मोठे अपघात घडतात. त्यामुळे ही स्मशानभूमी सर्व बाजूने धोकादायक झाली आहे. या स्मशानभूमीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने मोर्चे झाले मात्र हा प्रश्न कोणालाही सोडविता आला नाही.
मागील १५ वर्षांचा विचार केल्यास या परिसरात सर्वच पक्षांची सत्ता राहिलेली आहे. लोकसभेत १५ वर्षे शिवसेनेला प्रतिनिधीत्व मिळाल्यानतंर आता याठिकाणी राष्ट्रवादीचे खासदार आहेत. तर विधानसभेसाठी या भागाने अनुक्रमे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीला संधी दिली आहे. त्याचबरोबर, महापालिकेत गेल्या पाच वर्षात या प्रभागात भाजपचे तीन तर शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आले होते. मात्र, हा स्मशानभूमीचा प्रश्न कोणालाही सोडविता न आल्याने राजकीयदृष्ट्या स्मशानभूमीचा प्रश्न उपेक्षित राहिला असल्याचे दिसून येते.
खडीमशीन चौकाजवळ स्माशानभूमीची उभारणी करण्यात आलेली आहे. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे ती स्मशानभूमी विद्युतदाहिनीपूरतीच चालू करण्यात आली असल्याने नागरिक त्याचा वापर करत नाहीत. पर्यायाने जुन्याच स्माशानभूमीच्या ठिकाणी गर्दी होते. त्यामुळे नागरिकांनी नवीन विद्युतदाहिनीवरील स्माशानभूमीचा वापर करावा. जेणेकरुन प्रदूषणही होणार नाही आणि नागरिकांना त्रासही होणार नाही.