बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीला आग लागली. या भीषण आगीत बारा मजूर जिवंत जळाले. तर तर २१ मजूर गंभीर भाजले. कारखान्यात आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये शनिवारी घडली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले होते. जळालेल्या लोकांना मेरठ आणि गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामुळे जवळपासच्या तीन कारखान्यांचेही नुकसान झाले आहे.
हापूर जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडी कारखाना आहे. या कारखान्यात केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हापूर जिल्ह्यात बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत बारा मजुरांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बॉयलर स्फोट प्रकरणी तज्ज्ञांकडून चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
ज्या कारखान्यात हा अपघात झाला त्या कारखान्यात फक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यास परवानगी होती. मात्र, येथे नेमके काय घडत आहे याची चौकशी केली जाईल. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण गंभीर जखमी झाले.