कोल्हापूर: जिल्ह्याला आज सायंकाळी आलेल्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव, जोरदार पाऊस यामुळे अवघे कोल्हापूर शहर काही काळातच जलमय झाले होते. झाडे कोसळल्याने विजेचा व्यत्यय, जलकोंडी, वाहतूक अडथळा यासारख्या अडचणी उद्भवल्या. पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले गेले.
सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने कळवले होते.आज दुपारी जिल्हा प्रशासनाने सायंकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला होता.
तासाहून अधिक काळ जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटारी नाले तुडुंब भरून वाहू लागली. रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले. अवघे शहर काही काळातच जलमय झाले. दुकानामध्ये पावसाचे पाणी घुसले. फेरीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील सखल भागात घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची रात्री एकच तारांबळ उडाली होती .अशातच रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. घरी परतण्याची लगबग भर पावसात सुरु होती. सोसाट्याचा वारा सुरु झाल्यावर नेहमीप्रमाणे महावितरणने विज घालवली. यामुळे अंधारात वेळ काढणे भाग पडले. शहराच्या काही भागांमध्ये वृक्ष कोसळले. यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण झाली.
विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ तासांत रत्नागिरीमध्ये घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.